पुण्यातून किल्ले चंदन-वंदन ला कसे जाल (How to Reach Chandan-Vandan fort from Pune)
हि पोस्ट लिहायला खर तर तसा चांगलाच उशीर झाला आहे पण असो. बरेच दिवस झाले कुठे गेलो नव्हतो आणि solo trek पण केला नव्हता. एक दिवस सुट्टी मिळाली तारीख होती २९ मार्च २०२३. मग काय आदल्या दिवशी रात्री साताऱ्या लागत असलेल्या चंदन-वंदन या जोड गोळीची निश्चिती केली. इंटरनेट आणि पुस्तकात ज्याबद्दल वाचल होत ते आज पाहायला मिळणार. खूप उत्सुकता होती. साधारण पहाटे ५ वाजता घर सोडल आणि प्रवास चालू झाला.थोडा वेळ वाट पाहून शनिवारवाडा ते स्वारगेट अशी PMT मिळाली. स्वारगेट बस स्थानकामध्ये साधारण ५:३० वाजता पोहचलो, तिथे कळले कि साताऱ्या ला जाणारी गाडी ६:०० वाजता निघणार आहे. मग गाडी मध्ये बसून गाडी निघायची वाट पाहत होतो. वेळ होताच गाडी निघाली आणि आता खऱ्या अर्थाने माझा गडांच्या कडे जाणारा प्रवास चालू झाला होता.
साधारणपणे इ.स ११९१ - ११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६५९ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले.हि जोड गोळी गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ले या प्रकारामध्ये मोडतात. किल्य्याची उंची समुद्र सपाटीपासून ३८०० फुट असावी.
तिकीट काढतानाच कंडक्टर यांना सांगितल होत कि भुईंज हे गाव आल कि सांगा कारण हे गाव साताऱ्या पासून २० किलोमीटर अलीकडेच आहे त्याच बरोबर मी सुद्धा लक्ष ठेवूनच होतो.सकाळी ८ च्या सुमारास मी भुईंज या बस स्थानकावर उतरलो. बेलमाची या गावी जाणाऱ्या बस ची चौकशी करू लागलो. डेपो मधून कळल कि येईल बस. म काय जरा आजूबाजूला पाहतच होतो इतक्यात एक काका भेटले, मी त्यांच्याकडे चौकशी केली बेलमाची गावी कसे जाता येईल? त्यावर ते म्हंटले मी बेलमाचीचा च आहे कुणाकड आलात? म मी म्हणतलो काका गडावर जायचं आहे चंदन-वंदन. म त्यांनी बघितल कि गावातून कुणी भुईंज ला येणार आहे का, जरा २-३ फोन लावले पण कुणी येणार नव्हते. पण त्यांनी सुचवले कि बेलमाची पेक्षा कलंगवाडी या गावी जा इथून गणेशखिंडीपर्यंत थेट बस जाते आणि गणेशखिंडीतून किल्ला अगदी तास-दीड तासात होतो.जस काकांनी सांगितल्या प्रमाणे एका टमटम ने कलंगवाडी पर्यंत सकाळी ८:४५ वाजता पोहचलो. इथून गणेशखिंडी कडे जाणारी बस लगेच आली आणि ९ वाजता मी गणेशखिंडीत पोहचलो देखील. उतरताना कंडक्टर यांना परतीच्या बसची माहिती घेऊन ठेवली. साधारण १२ वाजता असेल अस सांगितल आणि सगळ्यात शेवटची बस ५ वाजता असते.
११:३० पर्यंत दोन्ही किल्ले पहायचे हे मनाशी नक्की केल आणि गड चढाईस सुरवात केली. वंदन हा किल्ला गणेशखिंडी पासून लांब असल्याने आधी तो करायचा ठरवल. अगदी खडी चढाई असल्याने आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्याने चढाई करताना जरा दमणूक होत होती. पण मला १२ पर्यंत दोन्ही किल्ले पाहून पूर्ण करायचे होते. अगदीच कमी विश्रांती घेऊन सुमारे १०:२० वाजता माझा वंदन किल्ला हा पाहून झला. मधला अधला दिवस असल्याने गडावर फक्त मी एकटाच होतो. गडाच्या प्रवेशद्वारातून आत जाताच तिथे एक शिलालेख नजरेस पडतो. गडावर काही पडके अवशेष आहेत काही ठिकाणी त्याला नावे दिली आहे तर काही कळत नाहीत नक्की काय असावे.सर्वात प्रथम गडावर आपल्याला चुन्याचा घाणा नजरेस पडतो, पडक्या अवस्थेत काही पायऱ्या आहेत. वंदनेश्वराचे अगदी लहानसे मंदिर आहे. थोड वर चढून गेलं की इथे पूर्वी गडाची वस्ती असावी. एक पाण्याच टाक देखील आहे पण ह्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. तसेच दारुकोठार किंवा धान्यकोठार अश्या साठी सुद्धा गडावर जागा असल्याचे दिसते.पूर्वी ह्या गडाला बालेकिल्ला असावा असे भासते. शिवाय एक दर्गा देखील आहे.
प्रवेशद्वार
उर्दू मधील शीलालेख
चुन्याचा घाणा
धान्यकोठार / दारुकोठार
वंदनेश्वर
वंदन गडप्रमाणे चंदन गडावर एक चंदनेश्वराचे मंदिर आहे यातील दोन्ही पिंडी पाच लिंगाच्या आहेत. एक विहीर आहे यातील पाणी काढण्यासाठी आपल्याकडे दोरी असणे आवश्यक आहे विहिरीत केवळ पावसाळ्यातच पाणी असते. पाच वडाच्या झाडांचे एक झाड म्हणून याला पाचवड असे हि म्हणले जाते. ह्या गडावर फारसे अवशेष नाहीत त्यामुळे किल्ला अगदी सहज पाहून होतो. दोन्ही गडांच्या चारही बाजूने नैसर्गिकच खडी चढाई असल्याने गडांना वेगळी तटबंदी नाही.
दोन्ही गड आता ११:१५ वाजताच बघून झाले होते अर्धा दिवस अजून शिल्लक होता. मग काय कराव असा विचार गड उतरताना केला मग गुगल गुरुजींची मदत घेतली आजू बाजूला अजून कोणते किल्ले जवळ आहेत का पहाव लगेच होण्यासारखे तर वैराटगड साधारण ह्याच रस्त्यावर आहे आणि लगेच होऊ शकतो. मग काय गणेशखिंडीत पोहचलो आणि बस ची वाट पाहत बसलो. नेहमी प्रमाणे लालपरी ने वाट पाहायला लावली आणि १२ ची गाडी १२:३० वाजता आली. बस मध्ये चढताच कंडक्टर काका ना विचारल बस व्याजवाडी (व्याजवाडी हे वैराट गडाच्या पायथ्याचे गाव आहे) पर्यंत जाईल का तर त्यांनी अस सांगितल कि कडेगाव पुलावर उतरा तिथून ५ किलोमीटर व्याजवाडी आहे तिथून वेगळ्या गाडीने तुम्हाला जाव लागेल. आणि आता माझा प्रवास हा वैराट गडाच्या दिशेने प्रवास चालू झाला होता.
अंदाजे जायचा खर्च एकाचा :स्वारगेट ते भुईंज (S.T) १२०/-
भुईंज ते कलंगवाडी १५/-
कलंगवाडी ते गणेशखिंड २०/-
एकूण खर्च १५५/-
परतीचा एकाचा खर्च :
भुईंज ते स्वारगेट १२०/-
एकूण खर्च १२०/-
***काही महत्वाच्या गोष्टी ***
चंदन वंदन हे किल्ले चढाई ला अवघड नाही.
किल्ल्यावर राहण्याची सोय केवळ दर्ग्यातच होऊ शकते.
गडांवर केवळ पावसाळ्यात पिण्याचे पाणी असते.
गडावर जेवणाची सोय हि आपल्यालाच करावी लागते.
स्वारगेट वरुन साताऱ्याच्या दिशेने सारख्या बसेस आहेत पण भूईज येथून मात्र पूर्ण पुढच्या गाड्यांची चौकशी करून घ्यावी आणि मगच पुढच्या प्रवासाला निघावे.
Comments
Post a Comment